बावधन येथे ट्रकचालकावर वार करुन साडेअकरा हजारांचा ऐवज लंपास

0
587

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकचालकावर अज्ञात दोघा चोरट्यांनी तिक्ष्ण हत्याराने वार केले. तसेच त्याच्याकडील साडेदहा हजारांची रोख आणि १ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री उशीरा सव्वा बाराच्या सुमारास मुंबई-बॅगलोर महामार्गावरील सुतारवाडी नवीन पुलाजवळ घडली.

याप्रकरणी ट्रकचालक अनिलकुमार अमरसिंग पटेल (वय २४, रा. कलमदपुर पोस्ट बडगाव, तहसील सुरामजी जिल्हा इलाहाबाद, राज्या उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिलकुमार हे ट्रकचालक आहेत. बुधवारी रात्री उशीरा सव्वा बाराच्या सुमारास ते त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच/०४/जेयु/०२४५) घेऊन मुंबईच्या दिशेने चालले होते. ते बावधन सुतारवाडी येथील नवीन पुलाजवळ पोहचले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांची दुचाकी ट्रकच्या आडवी लावली. तसेच बांबुने क्लिनर पिंटु हिरालाल सिंग (वय १८) याला मारहाण केली. तसेच ट्रकचालक अनिलकुमार यांच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने वार केले आणि त्यांच्याकडील साडेदहा हजारांची रोख आणि १ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला. हिंजवडी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.