पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश

0
619

सातारा, दि.२३ (पीसीबी) – पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांची पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींचा राजशिष्टाचार जाणीवपूर्वक पाळत नाहीत, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी आज विधानसभेत केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शासनाने या संदर्भात तात्काळ कारवाई करावी, असा आदेश दिला.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी आमदार शंभूराज देसाई यांनी औचित्याच्या मुद्दा मांडताना ही बाब विधिमंडळ सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सभागृहातील सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आमदारांनी या संदर्भातील तक्रार सभागृहात करून आमदार देसाईंच्या मुद्द्याला समर्थन दिले. आमदार देसाई म्हणाले, “”लोकप्रतिनिधीसंदर्भात विशेषत: विधानसभा सदस्यांच्या संदर्भात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची वर्तणूक आणि वागणूक ही असौजन्याची आहे. विधानसभा सदस्यांना पोलिस यंत्रणाकडून राजशिष्टाचारासंदर्भात (प्रोटोकॉल) आदराची, सन्मानाची व सौजन्यांची वागणूक देण्याविषयी शासनाने २७ जुलै २०१५ व त्यापूर्वी अनेकदा शासन निर्णय दिले  पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ, तसेच कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींच्या सौजन्याच्या वागणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेऊन त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मी स्वत: एकदा नव्हे तर चार-चार वेळा त्यांना सर्व शासन निर्णय जोडून पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांनी त्यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याची तसदी घेतली नाही, तसेच फोनवर माहिती विचारली तर त्यांना ती देताही आली नाही. ही बाब शासनाच्या आदेशांची आणि निर्णयांची पायमल्ली करणारी आहे. या संदर्भात इतर सदस्यांनी ही बाब सभागृहात शासनाच्या निदर्शनास आणून दिली. नाना पटोले म्हणाले, “”या विषयाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. कुठलेही अधिकारी विधिमंडळाच्या सदस्यांबद्दल अशा पद्धतीची वागणूक करत असतील तर कोणीही खपवून घेण्याचे कारण नाही. शासनाचे जे धोरण आहे त्याच पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. सदस्यांचा मान सन्मान हा राखलाच पाहिजे. जे अधिकारी शासन आदेश, तसेच निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.”