‘पोलिसांकडूनच दुकानं ४ नंतर चालू ठेवण्यासाठी होतेय हफ्तावसुली’ : मनसे’नं व्हिडीओ शेअर करत केला आरोप

0
244

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : कोरोनाने जगभर थैमान घातलेलं असताना कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्षदर्शी पाहता काही वेगळंच चित्र दिसत आहे. मुंबई पोलिसांकडून करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी दुकाने सुरु ठेऊ देण्यासाठी भ्रष्टाचार आणि हफ्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे यांनी दादरमधील एक व्हिडीओ शेअर करत पोलीस कोणत्या दुकानांकडून वसुलीसाठी किती रक्कम घेतात याचं ‘रेट कार्ड’चं सांगितलं आहे.

दादर पश्चिमेला रेल्वे स्टेशनबाहेरील भाजी मंडईजवळ असणाऱ्या नक्षत्र मॉलच्या गल्लीमधील दुकाने ही दुपारी चार वाजल्यानंतरही खुली असल्याचं दाखवणारा व्हिडीओ देशपांडे यांनी पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये दुपारी चार वाजल्यानंतरही अनेक छोटी, मोठी दुकाने सुरु असल्याचं व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सांगत आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने दुपारी चारनंतर या गल्लीतून बाईकवरुन फेरफटका मारत येथील परिस्थिती कॅमेरात कैद केलीय. अनेक दुकाने ही अर्धी शटर उघडी ठेऊ सुरु असल्याचं तसेच काही दुकांनांबाहेर दुकानातील कर्मचारी उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या हलचालींवर नजर ठेवत असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना संदीप देशपांडेंनी ट्विटरवर व्हिडीओला, “आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून,” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “मुंबईमध्ये करोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु,” असल्याचं म्हटलं आहे. संध्याकाळी चारनंतर दुकान सुरु ठेवण्यासाठी मोठ्या दुकानांकडून पाच हजार रुपये, मध्यम आकाराच्या दुकांनांकडून दोन हजार तर छोट्या दुकानांकडून एक हजार रुपये वसूल केले जातात असा आरोप देशपांडेंनी केलीय. या वसुलीच्या दरांना त्यांनी ‘रेट कार्ड’ असं म्हटलं आहे. निर्बंधकाळात बाजारपेठा सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुल्या राहतील असे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. गल्लोगल्ली बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे जमावाने होणारी खरेदी यामध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. काही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होऊन देखील फेरीवाल्यांना निर्बंधांची पर्वा राहिलेली नाही. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने कारवाईलाही सामोरे जाऊ, असा सूर फेरीवाल्यांचा आहे.

करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये बाजारपेठा, दुकाने खुली ठेवण्यासाठी सायंकाळी ४ पर्यंतची मर्यादा घालण्यात आली. परंतु या निर्बंधांना बाजारपेठांमध्ये हरताळ फासला जात आहे. सायंकाळी ४ नंतर घरी परतणारा कर्मचारीवर्ग खरेदीसाठी येत असल्याने दुकानदार तासभराच्या दिरंगाईने दुकाने बंद करतात. साधारण सायंकाळी ६ च्या सुमारास सर्व दुकाने बंद होतात. पण त्याच वेळी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना उधाण येते. दुकाने बंद झाल्याने जास्तीचा ग्राहकवर्ग मिळतो, घरी जाणारे लोक आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या प्रकाराला अधिकच खतपाणी मिळते आहे.

मुंबईतील बहुतांशी भागात हीच परिस्थती आहे. दादर स्थानकाबाहेरची अवस्था अत्यंत बिकट आहे. कबूतरखाना, आसपासच्या गल्ल्या आणि स्थानक परिसरात शेकडो फेरीवाले रात्री उशिरापर्यंत दुकाने मांडून बसलेले असतात. अनेकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलेला असतो. फेरीवाल्यांचे पेव धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, परळ, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी आणि अन्य मध्यमवर्गीय वस्त्यांनजिक पाहायला मिळते. फुले, फळे, भाज्या, चपला, कपडे, भांडी इत्यादी वस्तू घेऊन बसलेल्या या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या आणि पालिकेच्या गाडय़ा येताच फेरीवाले आवाराआवर करून पळ काढतात. बऱ्याचदा कारवाई केल्यानंतरही पुन्हा फेरीवाले दुकान थाटतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘कारवाईदरम्यान कठोर भूमिका घेता येत नाही. तसे केले तरी त्याचे चुकीचे प्रदर्शन माध्यमातून केले जाते. शिवाय प्रत्येकाचीच परिस्थिती हलाखीची असल्याने दंड आकारतानाही फेरीवाले गायावया करतात, हात जोडतात. त्यामुळे परिस्थिती संयमाने हाताळावी लागते,’ असे दादर येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.