नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पुढील दोन महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुढील ‘मन की बात’ हा कार्यक्रम मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. या तीन महिन्याच्या कालावधी मध्ये येणारे अनुभव आणि भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आपल्यासमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून सांगेन. आपल्याशी अनेक वर्ष पुढे देखील संवाद साधत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी आज (रविवार) आकाशवाणीवरुन अखेरच्या ‘मन की बात’द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी पुन्हा निवडून येऊ व जनतेशी मन की बातमधून संवाद साधू ,असा विश्वास व्यक्त केला.
मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन केले. आपल्या सैन्य दलांनी नेहमीच शौर्य दाखवून दिले आहे. एकाबाजूला त्यांच्याकडे शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य आहे. तर दुसरीकडे ते दहशतवादाला त्यांच्या भाषेत कसे उत्तर द्यायचे याची त्यांना चांगली माहिती आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मोदी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’ची माहिती दिली. इंडिया गेट येथे उभारण्यात आलेल्या या स्मारकाचे सोमवार २५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.