‘पवार कुटूंबियांवरील छापे म्हणजे राजकीय षडयंत्र’ : संजोग वाघेरे पाटील

0
404

– भाजपाच्या आजी माजी मंत्र्यांवर कारवाई का नाही…..आमदार आण्णा बनसोडे
– ईडी, आयटी म्हणजे मोदी, शहा यांचे घरगडी…..माजी आमदार विलास लांडे पाटील

पिंपरी, पुणे, दि. 8 (पीसीबी) देशभर वाढलेले इंधनदर त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. रोजच वाढत्या महागाईमुळे देशभरातील नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. तसेच दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात वाहने अंगावर घालून त्यांना चिरडून ठार करण्यात आले. यामुळे देशभरातील शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे माध्यमांचे लक्ष जाऊ नये या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात ईडी आणि आयटीचे छापे टाकण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरु केलेली ही कारवाई सुडबुद्दीचे आणि नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकीय षडयंत्र आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.

गुरुवार पासून ईडी आणि आयटी विभागाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात छापे टाकले आहेत. याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 8 ऑक्टोबर) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, राहुल भोसले, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, अपर्णाताई डोके, मंगलाताई कदम, डॉ. वैशाली घोडेकर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेवक अजित गव्हाणे, अतुल शितोळे, मोरेश्वर भोंडवे, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, निकीता कदम, पंकज भालेकर, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, संगिता ताम्हाणे, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, विश्रांती पाडाळे, माजी नगरसेवक शमिमताई पठाण, अरुण बो-हाडे, संदिप चिंचवडे, सन्नी ओव्हाळ, राजेंद्र जगताप, शाम जगताप, श्रीधर वाल्हेकर, प्रसाद शेट्टी, संजय वाबळे, शकुंतला भाट, जगन्नाथ साबळे, काळूराम पवार, माऊली सुर्यवंशी, राजेंद्र साळुंखे, तानाजी खाडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, सामाजिक न्यायविभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे, सामाजिक न्यायविभागाच्या महिला शहराध्यक्षा गंगाताई धेंडे, पदवीधर सेल शहराध्यक्ष माधव पाटील, तसेच अरुण पवार, कविता खराडे, पुष्पाताई शेळके, ज्योती गोफणे, मेधा पळशीकर, आशा शिंदे, सविता धुमाळ, संगिता कोकणे, उज्ज्वला ढोरे, वैशाली पवार, अमरसिंह आदियाल, तानाजी जवळकर, देविदास गोफणे, तुकाराम बजबळकर, दिपक साकोरे आदी उपस्थित होते.

आमदार आण्णा बनसोडे यावेळी म्हणाले की, भाजपच्या आजी माजी मंत्र्यांचेही साखर कारखाने व इतर उद्योग, व्यवसाय आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. पुरोगामी महाराष्ट्रात औद्योगिक व सामाजिक क्रांती घडविणारे लोकनेते शरद पवार यांनी लखीमपूर येथिल शेतकरी आंदोलनावर टिपणी केली. त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ईडी व आयटीने ही कारवाई केली.

माजी आमदार विलास लांडे या कारवाईबाबत केंद्र सरकारवर टिका करताना म्हणाले की, केंद्राची ईडी व आयटी हे मोदी, शहा यांचे घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहेत. मोदी, शहा यांच्या ईशा-यावर डोंबा-याच्या खेळाप्रमाणे वागत आहेत. राजकारणातून समाजकार्य कसे करावे याचा आदर्श म्हणजे लोकनेते शरद पवार आणि अजित पवार हे आहेत. त्यांच्या कुटूंबियांना त्रास देऊन महाराष्ट्रातील राजकरण विस्कळीत करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे असे प्रतिपादन करीत विलास लांडे यांनी केंद्र सरकारचा जाहिर निषेध केला.