पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये – राज ठाकरे   

0
587

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये,  पाकिस्तानची खरेच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिले पाऊल हे त्यांनीच उचलायला हवे. त्यांनी वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडले पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबलाच पाहजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ( गुरुवारी) प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात  राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन  केले आहे. अशा प्रकारचे आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देखील केले होते. या हल्ल्यात आपण आपले सीआरपीएफचे ४० जवान गमावले होते, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यकच होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन देखील केले होते.

काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचे आवाहन केले आहे. आणि इतकेच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चेस तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवाने या चर्च पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत.

जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे. ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात, तर आपण का नाही येऊ शकत ? असा सवाल त्यांनी केला आहे.

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील  निष्ठूरपणे, म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचे वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.