नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – देशभरात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार गुमान सिंह डामोर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष असून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली आहे. काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदींनी कोट्यवधी भारतीयांचा आनंद द्विगुणीत केलाय, त्यासाठी मोदींना भारतरत्न पुरस्कार दिला जावा असे डोमार म्हणाले. संसदेत शून्य प्रहरादरम्यान डोमर यांनी ही मागणी केली.
मध्य प्रदेशच्या रतलाम येथील भाजपा खासदार गुमान सिंह डामोर यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान जम्मू-काश्मीरमधून घटनेतील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचं कौतुक केले. यावेळी बोलताना, मोदी युगपुरूष आहेत, जगातील अन्य अनेक देशांनी मोदींना पुरस्कार दिलेत. आज त्यांनी कोट्यवधी भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला आहे. यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी त्यांनी केली.