पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोनीला खास पत्र, काय आहे पत्रात ?

0
226

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. धोनीनेच ट्विटवरुन हे पत्र शेअऱ केलं आहे.

पत्राच्या सुरुवातीलाच मोदींनी धोनीने अगदी त्याच्या खास शैलीमध्येच म्हणजेच अनपेक्षितपणे निवृत्ती जाहीर केल्याचा उल्लेख केला आहे. “१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत,” असं मोदी म्हणाले आहेत.

पुढे मोदींनी विश्वचषकातील शेवटचा सामना आणि तुझी फिनिशिंग स्टाइल कायम आमच्या स्मरणात राहणार असल्याचे म्हटलं आहे. “तुझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरलास. भारताला तू अग्रेसर बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिलं. इतिहासामध्ये तुझं नाव सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवलं जाईल. कठीण प्रसंगी तिच्यावर निर्भर राहणे आणि सामना संपवण्याची तुझी शैली खास करुन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सर्व सामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील,” असं पंतप्रधान म्हणतात.

खेळाबरोबरच धोनीकडे त्याच्या खडतर प्रवासासाठी आणि प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाईल असंही मोदींनी म्हटलं आहे. “महेंद्र सिंह धोनी हे नाव केवळ खेळातील आकडेवारी आणि सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे असंच म्हणता येईल. एका लहानश्या शहरामधून सुरु करुन तू राष्ट्रीय पातळीवर आला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि महत्वाचं म्हणजे भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीस. तुझी प्रगती आणि कामगिरी ही करोडो भारती तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तुझ्याप्रमाणे ते अगदी नावाजलेल्या शाळा, कॉलेजांमध्ये गेले नाहीत. त्यांचे कुटुंबही जास्त प्रभावशाली कुटुंबांपैकी नाही मात्र आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर त्यांनी तुझ्याप्रमाणे यश मिळवलं आहे अशांसाठी तू प्रेरणास्थान आहेस. तू तरुण भारताचा खरा चेहरा आहेस. ज्या भारतामध्ये तुमचे अडनाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे यावर त्यांचा प्रवास ठरत नाही तर तरुण स्वत: त्यांची ओळख निर्माण करुन वाटचाल करतात. आपण कुठून आलो आहोत यापेक्षा कुठे चाललो आहोत हे अधिक महत्वाचे असते याच नियमानुसार तू अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहेस,” असं मोदींनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.