Desh

नितीन गडकरी सर्वात कार्यक्षम मंत्री; एन्टी इक्म्बन्सी फॅक्टरलाही मोदी सरकारला सामोरे जावे लागणार, सर्वेक्षणातील मत

By PCB Author

August 13, 2022

नवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी सरकारला अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागलेला दिसतो आहे. एनआरसी-सीएए, शेतकरी कायदे मागे घेण्याची वेळ मोदी सरकारवर आलेली आहे. त्यातच आलेले कोरोनाचे आणि त्यापाठोपाठ आलेल्या वाढत्या महागाईचे संकट मोदी सरकारसमोर अजूनही आव्हान म्हणून आहे. अशा स्थिती एन्टी इक्म्बन्सी फॅक्टरलाही मोदी सरकारला सामोरे जावे लागणार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून राजद आणि काँग्रेसचा हात हाती घेतल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडले, याची चर्चा आता सुरु झाली आहे. अशा स्थितीत आज तकने इंडिया टूडे सी व्होटरच्या सर्व्हेत अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. देशातील आत्तापर्यंतच्या ऑलटाईम पाच पंतप्रधानांच्या नावांबाबत जनतेचे मत या सर्व्हेत मत जाणून घेण्यात आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 44.5 टक्के मते मिळाली. या यादीत ते सर्वोच्च स्थानी राहिलेले आहेत. त्याचबरोबर या सर्व्हेत मोदी सरकारचे टॉप पाच मंत्री कोण, हेही जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नितीन गडकरी यांना सर्वोच्च स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरींच्या नावाला पसंती मिळालेली आहे. इतर टॉप मंत्री कोण, हे जाणून घेऊयात.

1. नितीन गडकरी – मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचे काम जनतेला सर्वाधिक पसंत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी हे सर्वोच्च स्थानी राहिलेले आहेत. गडकरी य़ांना 22 टक्के मते मिळाली आहेत. गडकरींनी देशात जे रस्त्यांचे जाळे उभे केले आहे, याबाबत जनता गडकरींच्या कामावर खूष असल्याचे दिसते आहे. लवकरच 2024 डिसेंबरपर्यंत पायाभूत सोयीसुविधांच्या बाबत देश हा अमेरिकेच्या बरोबरीने असेल असे गडकरी म्हणाले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी ते साध्यही करुन दाखवले असल्याची जनतेची भावना आहे.

2. राजनाथ सिंह नितीन गडकरी यांच्या खालोखाल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा नंबर दुसऱ्या स्थानी आहे. राजनाथ यांना 20 टक्के मते मिळाली आहेत. संरक्षण मंत्रालयाचा कारभार सांभाळताना राजनाथ सिंह यांनी सैन्यदलाचे आधुनिकिकरण आणि शस्त्रास्त्र खरेदीत केलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. राजनाथ यांच्या कार्यकाळात भारतीय सैन्यदालाची ताकद आणखी दुणावल्याची भावना आहे.

3. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 17 टक्के मते मिळाली आहेत. शाहा यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय घेतलेत. जम्मू काश्मिरातून कलम 370 हटवणे, 35 ए, राममंदिर निर्माण आणि तीन तलाकसारखे ऐतिहासिक निर्णय शाहा यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. त्याचबरोबर अमित शाहा यांच्या कुशल नेतृत्वात देशभरातील निवडणुकांत भाजपाला वादातीत यश मिळवले आहे. अमित शाहा यांना भाजपचे चाणक्या म्हणूनही ओळखले जाते.

4. एस जयशंकर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. जयशंकर यांना 5टक्के मते मिळाली आहेत. 2019 साली जयशंकर हे मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यापूर्वी ते परराष्ट्र सचिव होते. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांनी त्यांचे कार्य उत्तम केल्याची भावना आहे. निवडणूक न लढवता थेट सत्तेत असणारे ते पहिले एकमेव मंत्री आहेत.

5. स्मृती इराणी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 5 टक्के मते मिळाली आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर अल्पसंख्याक खात्याची जबाबदारीही स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांनी मनुष्यबळ विकास, माहिती प्रसारण आणि टेक्सटाईलसारखी महत्त्वाची खाती सांभाळलेली आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या अमेठी मतदारसंघात इराणी यांनीच थेट आव्हान उभे केले होते.