धक्कादायक..!! खेड तालुक्यात मुलांनीच वडिलांना फरसाणच्या भट्टीत जाळले

0
178

चाकण, दि. २४ (पीसीबी) -वडिलांचे महिलेसोबत असलेल्या  अनैतिक संबंधाच्या रागातून वडिलांचा खून करून मृतदेह  फरसाण कंपनीच्या भट्टीत जाळून टाकल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी (१५ डिसेंबर) घडली आहे..

दरम्यान, दिल्ली येथे परपुरूषाशी विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून  पत्नीची गोळ्या झाडून २ जुलै १९९५ रोजी हत्याकांड झाला होता. आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून मृतदेह आपल्या मालकीच्या हॉटेलमधील जळल्या तंदूरमध्ये जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती पुण्यात झाली आहे. या घटनेमुळे पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या हत्याकांडाचा  छडा लावून महाळुंगे पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे.

धनंजय नवनाथ बनसोडे (वय ४३, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी धनंजय यांची मुले सुजित धनंजय बनसोडे (वय २१) व अभिजित धनंजय बनसोडे (वय १८) या दोघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

सहायक पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बनसोडे हे एक व्यावसायिक आहेत. त्यांची फरसाण बनविण्याची ‘ग्लोबल फूड्स नावाची कंपनी आहे. ते १५ डिसेंबर रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याची तक्रार महाळुंगे पोलिस ठाण्यात १९ डिसेंबरला आली होती.

दरम्यान, धनंजय बनसोडे यांचे नागपूर येथील एका महिलेसोबत तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरी समजली होती. त्यामुळे धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित, अभिजित यांच्याशी वारंवार वाद होत होते. तसेच मुले आपला घातपात करून जीवे ठार मारतील, अशी शंका त्यांनी नागपूर येथील प्रेयसीस बोलून दाखवली होती.

सदर घटनेचा तपास गुन्हे शाखेचे करीत असताना, पोलिसांनी धनंजयच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. पोलिसांनी सदर खुनाविषयी तिची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना खुनाचे धागेदोरे मिळण्यास सुरवात झाली. पोलिसांनी धनंजय यांच्या दोन मुलांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी १५ डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला.

त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. त्यांची हाडे फक्त शिल्लक राहिली. त्यानंतर आरोपींनी वडील धनंजय बनसोडे बेपत्ता फिर्याद १९ डिसेंबर रोजी दिली. अशी माहिती गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.

ही कामगिरी महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, विनोद जाधव, चेतन मुंडे, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, गणेश नूर गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे यांनी केली आहे.

दिल्ली तंदूर हत्याकांड काय आहे प्रकरण?
सुशील कुमारने पत्नी नैना सहानीचे परपुरूषाशी विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून २ जुलै १९९५ रोजी त्यांच्या रहात्या घरी पत्नीवर गोळ्या झाडल्या. व आरोपीने सुशील कुमारचा क्रूरपणा इथेच संपला नाही तर नंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर सुशील आणि केशवने खलबत केली. आणि भविष्यात आपला गुन्हा उघड होवू नये. यासाठी मृतदेह जाळून टाकण्यावर त्यांचे एकमत झाले. आणि आरोपींनी आपल्या मालकीच्या हॉटेलचा वापर करत, जळल्या तंदूरमध्ये हा मृतदेह जाळण्यात आला.

पोलिसांना आला संशय
नेहमीप्रमाणेच कॉन्स्टेबल अब्दुल नजीब कुल्लू हे आपला साथीदार होमगार्ड चंदर पालसोबत दिल्लीतील अशोक नगर परिसरात गस्त घालत होते. त्या दिवशी त्यांचा वायरलेस सेट पोलिस ठाण्यातच राहिला होता. नेहमीप्रमाणेच गस्त घालत असताना बगिया रेस्टॉरंटकडून आगीचे लोळ आणि धुराचे लोट अशोक यांनी पाहिले. सुरवातीला हॉटेलमध्ये आग लागली असावी हा अंदाज करत दोघे रेस्टॉरंकडे मदतीसाठी धावले. मात्र घटनास्थळी गेल्यावर ना अपेक्षित गर्दी होती ना आरडाओरडा! उलट दाराजवळ हॉटेलमालक सुशील शर्मा शांतपणे उभा होता. आपल्या हॉटेलला आग लागली असताना मालक असा शांतपणे त्याकडे पहात उभा आहे ही बाब पोलिसी नजरेला खटकली आणि इथेच संशयाला सुरुवात झाली.

कसे उलघडले गुन्ह्याचे रहस्य
नजीब यांनी सुशील यांच्याकडे चौकशी केली असता, पार्टीचे बॅनर जाळत असल्याचे थातुरमातुर उत्तरे देण्यात आली. नजीबनी जवळ जाऊन पाहिले असता तंदूरच्या आत एखादा प्राणी जळत असल्यासारखे वाटले. अखेर दटावल्यानंतर केशवने सांगितले की बकरा जाळत आहोत मात्र नजिब यांच्या तीक्ष्ण नजरेने तंदूरमधील जळून खाक झालेले मानवी हात पाय ओळखले. ती आग विझवण्याचा नजीब यांनी आटापिटा केला. वेळप्रसंगी भाजणाऱ्या हातांनीही त्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी खटपट केली आणि त्यांचे हे प्रयत्न पाहून धाबरलेल्या केशवने हॉटेलबाहेर पळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख आणि सुशीलचा जवाब यांनुसार सूशील यांच्या पत्नीची हत्या केल्याची बाब उघड झाली

दरम्यान, नजीब यांना संशय आल्यानंतर सुशील शर्मा बाहेरच्या बाहेर पळून गेला होता मात्र एका आठवड्यानं त्याला अटक करण्यात आली. ट्रायल कोर्ट आणि नंतर हायकोर्टानं सुशील शर्माला फाशी द्यावी असा निर्णय दिला मात्र सुप्रिम कोर्टानं हे वाक्य बदलून सांगितलं की, शर्माचा गुन्हा हा समाजाविरुद्ध गुन्हा नसून पत्नीशी असणार्‍या तणावपूर्ण नात्यातून घडलेला आहे.