Home Maharashtra त्यांचीही गणना तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?- गणेश नाईक
मुंबई, दि.११ (पीसीबी) – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात गेलेले गणेश नाईक आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असा टोला लगावला होता. आता त्यावर गणेश नाईक यांनी उत्तर दिलं असून पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल विचारला आहे.
गणेश नाईक यांनी म्हटले आहे की, “जनता, विकास आणि स्वाभिमान यासाठी आपण पक्ष बदलले आहेत. मुद्दामून आणि एकाएकी कोणी पक्ष बदलत नाही. याआधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलला आहे. मग त्यांचीही गणना तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?”. त्यावेळी गरज असते म्हणून पक्ष बदलले जातात. त्यामुळे खालील स्तरावर जाऊन टीका केली जाऊ नये असेही गणेश नाईक यांनी म्हटले आहे.