‘तुमची झाली युती आणि आमची झाली माती’ – रामदास आठवले

0
735

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – आरपीआय नेते व केंद्रीय मंत्री  रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदार संघातून लोकसभा  निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.  मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. याबाबत आठवले यांनी ‘तुमची झाली युती आणि आमची झाली माती’, अशा आपल्या खास शैलीत नाराजी व्यक्त केली.  

नागपूरमध्ये आज (मंगळवार) भाजपचे लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठवले बोलत होते. ‘काँग्रेस पार्टीने दे दिया धोका, लेकीन मोदींनी दिया मौका’, अशी कविता करत  आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन  भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याचे जाहीर केले.  त्यानंतर आठवले यांचे लोकसभा लढवण्याचे स्वप्न  धुळीस मिळाले. आठवले यांनी  जाहीर  सभेत याबाबतची  सल बोलून दाखवली.