अहमदनगर, दि. ३ (पीसीबी) – येत्या ९ तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (रविवार) सरकारला दिला आहे. कायदा होऊन ५ वर्षे झाली, तरी सरकार लोकपाल नियुक्त करायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात सुमारे तासाभर चर्चा झाली. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही राणेगणसिद्धीत दाखल झाले. या दोघांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात झालेल्या चर्चेत अण्णांनी केलेल्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र, लोकपाल नियुक्तीबाबत अण्णा आग्रही आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी अण्णांचे बोलणे करुन दिल्याचेही महाजन यांनी सागितले.