नवी दिल्ली, दि.२१ (पीसीबी) – कृषी विधेयकांवरून राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. कृषी विधेयकाच्या रुपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फर्मान काढत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधला होता.