जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरण: गृहमंत्र्यांनी पोलिसांवरील ‘ते’ सर्व आरोप फेटाळले

0
325

जळगाव, दि.०४ (पीसीबी) : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल मांडला. मात्र अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगत, पोलिसांवरील आरोपात काहीही तथ्य नसल्याची माहिती दिली.

“वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी पोलिसांची बाजू मांडत स्पष्टपणे सांगितलं आहे.

मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘करोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली?’ असं म्हणत विचारणा केली. या प्रश्नावर उत्तर देताना देशमुख यांनी सांगितलं की, “१७ महिलांना कविता म्हणण्याचं, गाणी गाण्याचं बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या”.त्यानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाच्या खालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का? असा सवाल केला असता अनिल देशमुख यांनी मात्र हे वृत्त चुकीचं असून हे मुलींचं नाही तर महिलांचं वसतिगृह असल्याचं म्हंटल आहे. तसंच हि बातमी ज्या वृत्तपत्राने दिली त्यांच्यावर कारवाई करणार असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.