जम्मूमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहिद

0
221

जम्मू : दि. २१ (पीसीबी)- जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे गाडीला आग लागल्याचे म्हटले जात आहे.

दहशतवादी संघटना PAFF ने घेतली हल्ल्याची जबाबदारी
दुसरीकडे, दहशतवादी संघटना पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. PAFF हे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे सुधारित रूप आहे. ज्याने यापूर्वीही अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील भटादुरिया भागात लष्कराच्या वाहनाला आग लागली. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवण्यात आली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली. त्यानंतर सायंकाळी लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे.

यामध्ये लष्कराच्या प्रवक्त्याच्या वतीने सांगण्यात आले की, लष्कराचे आरआर वाहन बिम्बर गलीहून पुंछच्या दिशेने जात होते. तीन वाजण्याच्या सुमारास या परिसरात त्याच्यावर दहशतवादी हल्ला झाला. मुसळधार पावसाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी वाहनावर गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेडही फेकण्यात आले. त्यामुळे सैनिकांना सांभाळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गाडीने पेट घेतला आणि वाहनात उपस्थित सहा जवानांना याचा फटका बसला. यामध्ये पाच जण जागीच शहीद झाले. एका जखमीला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाहन परिसरात गस्तीसाठी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हा मार्ग बंद केला आहे. लोकांना इतर मार्गांचा वापर करण्यास सांगितले आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहिमेसाठी पथके सुरू करण्यात आली आहेत. खरे तर या भागात यापूर्वीही दहशतवाद्यांशी चकमक झाली आहे. अशा स्थितीत या भागात दहशतवाद्यांचा काही गट सक्रिय असल्याचे समजते. ज्यांनी गुरुवारी पावसाचा फायदा घेत लष्कराच्या वाहनावर हल्ला केला आहे.