जनता समजूतदारपणे वागते मात्र भाजपचे नेते पोरकटपने वागतात – खासदार राजू शेट्टी

0
306

 

मुंबई, दि.२० (पीसीबी) -‘मुख्यमंत्री फंडाला दिलेली मदत मुख्यमंत्री घरखर्चाला वापरणार नाहीत किंवा पीएम फंडाला दिलेली मदत पंतप्रधान घरी नेणार नाहीत हे खरे असलं तरी आज महाराष्ट्र सरकारला पैशाची गरज आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील जनता आणि उद्योजकांनी मुख्यमंत्री फंडाला मदत करावी,’ असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

पुढे शेट्टी म्हणाले, ‘कोरोनाच्या विरोधात सामान्य माणूस आपल्या परीने योगदान देत आहे. जनता समजूतदारपणे वागत आहे मात्र भाजपचे महाराष्ट्रातील नेते पोरकटपने वागत आहेत,’ अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

‘मुख्यमंत्री पदावर कोण आहे हे बघण्यापेक्षा ते घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे पण भाजपवाले असल्या अडचणीच्या काळात सुद्धा सूडबुद्धीने वागत आहेत. दोन महिन्यांनी एकमेकांच्या उरावर बसा पण आता कशाला राजकारण करता? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सर्वच पक्षांनी महापूराच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली होती तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पीएम फंडाला मदत द्या असे का सांगितले नाही. आता जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असे सांगितले असते का? असं सुद्धा शेट्टी म्हणाले