धर्मशाला, दि. २७ (पीसीबी) – देशाचा चौकीदार झोपत नसल्यामुळेच चोरांची झोप उडाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिमाचल प्रदेशमधील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या ‘जन आभार’ सभेत मोदी आज (गुरूवार) बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने हिमाचल प्रदेशला दुय्यम वागणूक दिली. युपीए सरकारने हिमाचलला २१ हजार कोटी दिले होते. मात्र, एनडीएच्या सरकारने हिमाचलच्या विकास कामांसाठी ७२ हजार कोटी दिले. हिमाचल प्रदेशमध्ये केवळ पर्यटन आणि शेतीआधारीत विकास होणार नाही. तर औद्योगिक विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसने ‘वन रँक, वन पेन्शन’ वर जनतेची दिशाभूल केली होती. आता त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिशाभूल सुरू केली आहे, असे ते म्हणाले. ज्या लोकांना देश लुटण्याची सवय होती. त्यांना आज देशाच्या चौकीदारापासून भीती वाटत आहे. म्हणून चौकीदाराला शिव्या दिल्या जात आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.