“गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असेच पत्र लिहिलं का?” काँग्रेसच्या नेत्याचा राज्यपालांना थेट सवाल

0
511

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादाची धूळ अजूनही खाली बसलेली नाही. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांनाच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.
‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा सवाल राज्यपालांनी केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठामपणे उत्तर दिलं. ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही पदभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?,” असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.