गांधींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसने नरसिम्हा राव यांच्याकडे दुर्लक्ष केले; नातवाचा आरोप

0
727

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – नेहरु-गांधी कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसने माजी पंतप्रधान नरसिम्हा राव यांच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांच्या नातवाने केला आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नरसिम्हा राव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही केली. नरसिम्हा राव यांचे नातू एन व्ही सुभाष सध्या भाजपाशी संलग्न आहेत. नरसिम्हा राव यांची आज जंयती असून एकाही काँग्रेस नेत्यांना त्यांना आदरांजली वाहिली नाही असा आरोप यावेळी त्यांनी केला.

‘१९९६ मध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने नरसिम्हा राव यांना अनेक गोष्टींसाठी जबाबदार धरले. त्या गोष्टींचा सरकारच्या धोरणांशी काही संबंध नव्हता. नेहरु-गांधी कुटुंबाव्यतिरिक्त एखादी व्यक्ती मुख्य प्रवाहात असेल तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही असे वाटल्यानेच त्यांना दुर्लक्षित करण्यात आले’, असा आरोप एन व्ही सुभाष यांनी केला आहे.

‘काँग्रेस पक्षाच्या अपयशासाठी नरसिम्हा राव यांना जबाबदार धरण्यात आले. पण त्यांच्या योगदानाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मी मागणी करतो. त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे’, असे एन व्ही सुभाष यांनी म्हटले आहे.