खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी – देवेंद्र फडणवीस

0
254

– राज्य सरकारने पुणे महापालिकेला मदत करावी, मृत्यू दर रोखण्याला प्राधान्य हवे

पुणे, दि. २३ (पीसीबी) – कोरोनाची स्थिती, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्यात काही कमतरता असली तर त्या शासनापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने पुणे आणि सोलापूरचा हा प्रवास आहे. पुणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने सुद्धा महापालिकांना मदत केली पाहिजे. पुण्यात चाचण्यांची क्षमता कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे, अशी सुचना मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आदी भागातील कोरोना स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी आज दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पुण्यात चाचण्यांची व्यवस्था आणखी वाढविली गेली पाहिजे, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. पुण्यात कोरोना प्रादुर्भावाचा दर गेल्या काही दिवसांत 18 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. प्रशासन चांगले काम करीत असले तरी खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी ठरले आहे. रूग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला तर दिवाळे निघते आहे, असे फडणवीस म्हणाले.

कुणाला कमी लेखण्याची ही वेळ नाही. टीका करण्याची तर अजीबात नाही. पण, कुठे काही कमतरता राहत असेल तर ती निदर्शनास आणून देणे, हे आपले कर्तव्य आहे. आकडे कमी करण्याच्या नादात रणनीती चुकायला नको. संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रूग्ण ओळखतो येतो आणि त्यातून इतरांना सावध करता येतं. हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारला आहे, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या कारभारावर भाष्य करताना ते म्हणाले, मंत्र्या-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्री-प्रशासनात समन्वय नाही. आघाडीतील तीन पक्षात समन्वय नाही. हा समन्वय प्रमुखाने घडवायचा असतो. समन्वय योग्य असेल तरच लढाई जिंकता येते, असे त्यांनी नमूद केले. पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली.