कोरोना संकटातही यांनी तिजोऱ्या भरल्या

0
223

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन नुकतीच दोन वर्ष झाली आहेत. त्यानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर कोरोनाचं संकट उभं होतं पण आम्ही संकटाचं संधीत रुपांतर केलं, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर थेट आरोप केला. फडणवीस म्हणाले, ही कसली संधी? हे सरकार म्हणजे संधीसाधू सरकार आहे. कोरोना संकटातही यांनी तिजोऱ्या भरल्या, असा आरोप त्यांनी केला. एका वाहिनी प्रतिनिधीला मुलाखत देताना फडणवीस यांनी हा आरोप केला.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुख्यमंत्री म्हणाले, सरकारवर संकट आलं, त्याचं आम्ही संधीत रुपांतर केलं. याविषयी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, ”ही कोणती संधी आहे हे मला समजलं नाही. कोरोनाच्या काळात देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. 35 टक्के देशातील मृत्यू महाराष्ट्रात आहे.40 टक्के मृत्यू ऱाज्यात आहे. सर्वाधिक अफेक्टेड राज्य महाराष्ट्र आहे. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना मदत नाही. बाराबलुतेदारांना नवा पैसा दिला नाही. इतर छोट्या राज्यांनी बलुतेदारांना मदत केली. राज्य सरकारने एक मदत शेतकऱ्यांना दिले नाही. आमच्या काळात 15 हजार कोटी विम्याचे मिळाले, यांच्या काळात 500 कोटीही मिळाले नाही. त्यामुळे संधीचे रुपांतर कशात रुपांतर हे मला कळत नाही. मला एवढं लक्षात आलं की संकटात काही संधी साधू या सरकारमध्ये होते. त्यांनी संधी साधली आणि आपले खजाने भरले. यापेक्षा काही रुपांतर दिसलं नाही.

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या शिरकावामुळे जगावर पुन्हा एकदा संकट आलंय. यापूर्वी कोरोनाचे निर्बंध हटवण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता. मात्र आता नव्या संकटाबाबत भाजपची काय भूमिका असेल, याविषयी देवेंद्र फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, ज्यावेळी जो निर्णय घेणं अपेक्षित आहे त्यावेळी निर्णय घ्यावा. आम्ही समर्थन दिलं आहे. ओमिक्रॉनबाबत अद्याप लॉकडाऊनची परिस्थिती नाही किंवा चर्चा नाही. आपल्याकडे दोन्ही लसी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोन्ही लसी घेतल्या तरी कोरोना होतो पण जीवघेणा ठरत नाही. दुसरी लस घेतली नाही हर घर दस्तक अंतर्गत केंद्र सरकार दोन्ही लसी देणार आहे. त्यामुळे फायदा होईल. आता अर्थव्यवस्था खुली झाली आहे. अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध येऊ नये म्हणून नागरिकांनी लसीकरणावर भर दिला पाहिजे.