कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रहार

0
342

 मुंबई, दि. ८ (पीसीबी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 18 वर्षावरील लसीकरण चालू केलं तर लसींचे डोस अपुरे पडत आहेत. राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच लसीकरण केंद्र चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी चार लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झाल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र केंद्रसरकार यामध्ये हतबल झाल्याचं दिसून येत आहे, असंही मलिक म्हणाले.

मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे आणि वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्र सरकार अन्याय करत आहे की?, केंद्रसरकारला काम करता येत नाही?, असा टोला मलिकांनी लगावला आहे.

दरम्यान, लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.