केंद्र सरकारला महाराष्ट्राचा चित्ररथ डावलून कोणता घोडा पुढे सरकवायचाय – संजय राऊत

0
693

मुंबई,दि.२(पीसीबी) – प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?,” असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी आपला ट्वीटर द्वारे संताप व्यक्त केला आहे.“महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला.अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्राने यावेळी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने यावेळी राज्याचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात दिसणार नाही. दरवेळी रोटेशन पद्धतीने काही राज्यांना संधी मिळते. यंदा मात्र महाराष्ट्राचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.