करोनाग्रस्तांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार ?

0
569

महाराष्ट्र,दि.१५(पीसीबी) – करोनाची लागण झालेल्या दोघांचे मृत्यू देशात झाले. त्यामुळे करोना हे राष्ट्रीय संकट म्हणून केंद्राने जाहीर केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदतही जाहीर केली आहे.

आता राज्य सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून करोनाग्रस्तांचा सगळा खर्च उचलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात एकूण २६ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स १५ दिवस तर शाळा आणि महाविद्यालयं ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्दी टाळण्यासाठी मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. ‘वर्क फ्रॉम होम’ ज्या कंपन्यांना शक्य आहे ते त्यांनी अंमलात आणावं असंही निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

चित्रपटगृहं किंवा मॉल्स सुरु ठेवले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही सुरु राहतील, मात्र अनावश्यक गर्दी, प्रवास टाळावा. योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.