“ऑक्सिजनअभावी लोकांना तडफडून मरायचं नसेल तर नवीन पंतप्रधानांची गरज”

0
910

मुंबई,दि.०८(पीसीबी) – सध्या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोनामुळे दररोज कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. कित्येक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत स्वराने चक्क पंतप्रधान बदलण्याची मागणी केली. परंतु, तिच्या या मागणीमुळे नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केलं.

देशातील गंभीर परिस्थिती पाहून द प्रिंट वृत्तपत्राचे शेखर गुप्ता यांनी सरकार विरोधात ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोनासाठी नवीन यंत्रणा आणण्याचा सल्ला दिला होता. शेखर यांनी ट्वीट करत लिहिलं, ‘जर पंतप्रधानांना देश सुखरूप ठेवायचा असेल तर त्यांना नवीन यंत्रणा आणण्याची गरज आहे.’ शेखर यांच्या ट्वीटनंतर स्वराने लिहिलं, ‘भारताला एका नव्या पंतप्रधानांची गरज आहे. जर भारतीयांना त्यांच्या प्रियजनांना असं ऑक्सिजनसाठी तडफडून मरताना पाहायचं नसेल तर!’ या ट्वीटवर नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल करायला सुरुवात केली.

या ट्वीटनंतर ट्विटरवर #SwaraBhaskar हा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्वराला खरं- खोटं सुनावलं आहे. एका युझरने लिहिलं, ‘माफ करा पण हे २०२४ च्या आधी नाही होऊ शकत. आता तर यांनाच सहन करा.’ तर दुसऱ्या युझरने स्वराचा विरोध करत लिहिलं, ‘ही स्वरा भास्कर कोण आहे?’ इतरही अनेक युझर्सनी स्वराला विरोध दर्शवला आहे. यापूर्वीही पश्चिम बंगाल मधील मतदानाच्या निर्णयावर बीजेपी नेत्याला टोमणा मारत स्वराने लिहिलं होतं, ‘बंगालमध्ये ७० टक्के हिंदू आहेत. हिंदूंनी तुम्हाला लाथ मारून हाकलंय.’