एका कुटुंबातील चौघांचे खून करून मृतदेहाचे तुकडे करून घाटात फेकले

0
213

सातारा, दि.१(पीसीबी) : जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन मृतदेहाचे तुकडे करुन फेकून देण्याचा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून अजून एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील असल्याची माहिती समोर येते आहे. दोन मुलांसह त्याच्या आई-वडिलांना घाटातील जंगलात मारुन ते मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरुन या घाटात फेकून देण्यात आले होते.

येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना उग्र वास येऊ लागल्यानंतर मेढा पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने यातील तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृतदेहाचा शोध सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तीन मृतदेह एकाच दिवशी पोलिसांना सापडले नाहीत. 11 ऑगस्टला पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर 29 ऑगस्टला एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर आज 31ऑगस्टला एका मुलाचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांना यश आले आहे. अजून देखील एका मुतदेहाचा शोध सुरु आहे. हे हत्याकांड नेमके कोणत्या करणातून झाले, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील चौघांची अशी हत्या केल्याने सातारा जिल्ह्यात या घटनेने खळबळ माजली आहे.
पैशांच्या देवाण घेवाणीतून हे हत्याकांड घडलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी जावळी तालुक्यातील सोमर्डी गावातील संशयित योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.