मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १० वेळा अयोध्येला गेले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची उभारणी होईल, असा निशाणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर साधला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत अयोध्या दौरा करणार आहेत. याबाबत रामदास आठवले यांना विचारले असता ते म्हणाले की, हा दौरा म्हणजे शिवसेनेच्या खासदारांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यासाठीचा दौरा आहे. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच मंदिराची निर्मिती होईल, असे आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर…फिर सरकार…’अशी घोषणा दिली होती.