आळंदीतील दर्शनबारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत बैठक- नाना पटोले

0
327

आळंदी, दि.५ (पीसीबी) : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रलंबित असलेला दर्शनबारीचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने तसेच पवित्र इंद्रायणीच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यावश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी मुंबई येथे संबंधित विभाग व स्थानिक प्रतिनिधींची बैठक घेऊन दोन्ही प्रश्न तात्काळ मार्गी लावले जातील अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिली.

पटोलेे यांनी शुुक्रवारी (दि.४) रात्री उशिरा यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, राहुल चिताळकर, ह.भ.प. चैतन्य कबीर, व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित तसेच बहुचर्चेत असलेल्या दर्शनबारी आरक्षणाच्या जागेवर जाऊन नानासाहेब पटोले यांनी पाहणी केली. त्यांनतर भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणी नदीची पाहणी केली. मात्र पवित्र इंद्रायणीची सध्याची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी या भावनेतून लवकरच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून तिचं पावित्र्य जोपासण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरात आळंदी विकास आराखड्यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकीवारीत आवश्यक ती खबरदारी घेऊन सोहळा संपन्न करण्याच्या सूचना पटोले यांनी देवस्थान कमिटीला दिल्या. शेवटी आळंदीतील कबीर मठाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.