आम्ही एकत्र लढलो तर भाजपचे ५० आमदार पण निवडून येणार नाही -जयंत पाटील

0
299

पुणे , दि. ९ (पीसीबी) – राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे….

पुण्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची माहिती दिली. पाटील म्हणाले, भाजपाला अलीकडेच हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपकडून मिशन मुंबईचा नारा दिला गेला आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते. काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले..

सातारा येथे भर पावसात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा प्रचंड गाजली होती. या बहुचर्चित सभेने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच बदलले गेले होते. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत झालेला पाहायला मिळाला. त्याच सभेतील पवार यांचे भित्तीचित्र पुण्यात रमणबाग येथे रेखाटले गेले आहे. त्याचे अनावरण जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.