मुंबई , दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर बहुजन वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केलेले आहेत. या जाहीर केलेल्या २२ जागांवर आता माघार घेणार नाही , असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की , आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने २२ जागेवरील उमेदवार जाहीर केले आहेत. इतर जागांबाबत निर्णय होणे बाकी आहेत. तरी निश्चित केलेल्या २२ जागांवर आता कोणताही बद्दल करण्यात येणार नाही. तसेच या जागा मागे घेतल्या जाणार नाहीत . आम्ही काँग्रेस –राष्ट्रवादीला वेळ दिला होता. मात्र, त्यांनी त्यांचा लवकर निर्णय घेतला नाही, त्यामुळे आम्हाला निर्णय घेणे भाग पडले, असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार लक्ष्मण माने आणि पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. महाआघाडीबाबत हे नेते बोलतील ते सर्व आम्हाला मान्य असेल. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व मी करत असलो तरी, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाही आहे, असेही आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.