“आता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे”

0
234

नवी दिल्ली, दि.०३ (पीसीबी) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, “देशात आणीबाणी लावणं ही चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं”. या विधानानंतर पुन्हा एकदा आणीबाणीची चर्चा सुरू झाली असून, याच विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला गुजरात दंगलीची आठवण करून दिली आहे.

”आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, हे राहुल गांधी यांनी ४५ वर्षांनंतर स्वीकारलं. काँग्रेसनं कुठे न कुठे आपली चूक मान्य केली आहे. दिल्लीतील दंगलीबद्दल माफी मागितली. आता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. गुजरातमधील दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं. भाजपाला आम्ही पुन्हा एकदा विचारतोय. जर काँग्रेस आपल्या चुका सुधारत असेल, तर ते कधी चुका सुधारणार हे लोकांना सांगावं,” असा प्रश्न नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला विचारला आहे. विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी मलिकी बोलत होते. २५ जून १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात देशभरात आंदोलन पेटलं होतं. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरून आजही काँग्रेसवर टीका केली जाते. याच निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी “ती एक चूक होती,” असं स्पष्टीकरण देत म्हंटल आहे.

राहुल गांधी म्हणाले कि, “मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही.”