आजपासून श्री क्षेत्र आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन

0
516

पुणे, दि. २६ (पीसीबी) – विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर ते गुरुवार, दि.२ डिसेंबर २०२१ या दरम्यान संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ७२५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता होणार आहे. या सोहळ्याला आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.वैजयंताताई अशोक उमरगेकर, ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त श्री.योगेश देसाई, श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.नितीन महाराज मोरे, सौ. हेमलता काळोखे, श्री क्षेत्र देहूच्या माजी सरपंच सौ.पूनमताई विशाल काळोखे, प्रसिद्ध संगणकतज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती व सप्ताहाचे प्रमुख सल्लागार पद्मश्री डॉ. विजय भटकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा.स्वाती कराड-चाटे व डॉ. सुनिल कराड हे उपस्थित राहाणार आहेत.

Sahishnuta Saptah 2021 (2)

‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनावर नितांत श्रध्दा व निष्ठा ठेऊन सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.

या सोहळ्यात प्रज्ञाचश्रू ह.भ.प.श्री. गणपत महाराज जगताप, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. आसाराम महाराज बडे, परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.श्री. बबनरावजी पाचपुते, ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले, जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर इत्यादी मान्यवरांच्या प्रवचन व व्याख्यानातून विज्ञान, अध्यात्म व विविध धर्मांचा शांती संदेश यावरील विचार भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.

संध्याकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार ज्ञानेशभक्त आचार्य ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड, बीड येथील ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक, वै.ह.भ.प. दादा महाराज साखरे फडाचे प्रमुख व ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने होतील.

रात्रीच्या सत्रात विश्‍वशांती संगीत कला अकादमी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा विश्‍वशांती दर्शन अभंगवाणी कार्यक्रम, पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे व ह.भ.प. श्री रमेशबुवा सेनागांवकर यांचा सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम, भक्तिरंग भक्तिसंगीताचा कार्यक्रम पं. रविंद्रजी यादव व श्री. रामचंद्र यादव आणि सहकारी सादर करतील. पं.निवृत्ती धाबेकर आणि सहकारी आळंदी देवाची यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. तसेच सौ.भाग्यश्री देशपांडे, मुंबई आणि सहकारी यांचा अभंगवाणीचा सुरेल कार्यक्रम होईल.

संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवार,गुरुवार, दि.२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.

अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील का. कराड आणि समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.