रमझानमध्ये मतदानाची वेळ बदलता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

0
382

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी)- रमझानच्या महिना सुरू असल्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून मतदान सुरू करता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही तो निकाल कायम ठेवला आहे. मतदानाच्या वेळेबद्दल निर्णय घ्यायचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे.

रमझानमध्ये मुस्लिम बांधव पहाटे उठून अन्न सेवन करतात. त्यानंतर सूर्यास्तापर्यंत ते अन्न ग्रहण करत नाहीत. ते घराबाहेरही जास्त पडत नाहीत. तसंच यावेळी उकाडाही प्रचंड वाढला आहे. याचाच आधार घेत वकील निजामुद्दीन पाशा यांनी रमझान दरम्यान मतदान सात ऐवजी पाच वाजता सुरू करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला काही मुस्लिम संघटनांनी पाठिंबाही दर्शवला होता तर काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने मात्र केवळ रमझानसाठी मतदानाची वेळ बदलता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आहे.