नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – भारतातील बँकांना सुमारे ९ हजार कोटींना चुना लावून परदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने आज (सोमवार) मंजुरी दिली आहे. यामुळे मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात प्रत्यार्पणावर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान विजय मल्ल्या या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतो. त्याला अपिल करण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आम्ही लवकरात लवकर मल्ल्याला परत आणू याबद्दल सकारात्मक आहोत. या प्रकरणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्यार्पणासाठी पुरावे सादर करताना आम्हाला आत्मविश्वास होता, असे सीबीआयच्या प्रवक्त्या म्हटले आहे.
दरम्यान, मी आधीही बँकांचे कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. कर्ज फेडण्याच्या माझ्या विधानाचे प्रत्यार्पणाशी काही देणे घेणे नाही, असे मल्ल्याने म्हटले होते. आपण कर्ज फेडण्याची दाखवलेली तयारी बनावट नव्हती, असेही तो म्हणाला होता.