चिमुकली च्या न्यायासाठी नागरिक रस्त्यावर मात्र पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली आंदोलकांवर लाठीचार्ज!

0
3

दि.०३(पीसीबी)-पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या नराधमाने मुलीला गायीचं वासरु दाखवतो, असे सांगून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. यानंतर आरोपीने तिची हत्या केली. त्याने यानंतर मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून पळ काढला होता. यानंतर संध्याकाळी मुलगी घरी आली नाही तेव्हा शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन गेल्याचे दिसले आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला होता. या सगळ्यानंतर नसरापूरसह भोर तालुक्यात संतप्त पडसाद उमटले होते. राज्य सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे शनिवारी संध्याकाळी कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह घेऊन पुण्याच्या नवले पूलावर रास्ता रोको केला होता. यावेळी आंदोलकांनी तब्बल चार तास मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. या आंदोलकांना रस्त्यावरुन दूर करण्यासाठी पोलीस सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत होते. मात्र, आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरुन हटणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता.

अनेक तास मनधरणी करुनही आंदोलक नवले पुलावरुन हटण्यास तयार नसल्याने रात्री पोलिसांनी बळाचा वापर करुन मुलीच्या पालकांसह आंदोलकांना नवले पुलावरुन हटवले होते. यावेळी पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांची कॉलर पकडल्याचा दावा काही आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही आंदोलकांनी म्हटले. मात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमचे मुद्दे पटल्यानंतर मुलीचे पालक स्वखुशीने गाडीत जाऊन बसले, असा दावा अमितेश कुमार यांनी केला. दरम्यान, काल रात्री उशीरा चिमुरडीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवले पुलावरील कारवाईबाबत आपली बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, नवले पूलावर आंदोलकांनी चार ते साडेचार तास रास्तारोको केला. आम्ही मृत मुलीच्या नातेवाईकांना समजावून सांगितले. राज्य सरकार आणि पोलीस या प्रकरणात फास्ट ट्रॅकवर कारवाई करतील. आरोपपत्र लवकरात लवकर दाखल केले जाईल. मुलीचे कुटुंबीय म्हणतील, तो वकील दिला जाईल. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, असे आश्वासन आम्ही पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना दिल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटले.