दि.०३(पीसीबी)-माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी नुकताच पार पडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले असले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. त्यावर कोणत्या नेत्याची नियुक्ती करायची याबाबत राष्ट्रवादीमध्ये खल सुरू आहे. अगोदर या पदावर प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचे सांगितले जात होते. परंतु याबाबतचा दावा पटेल यांनी थेट फेटाळून लावत अजून कोणाचीही या पदासाठी निवड करण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची निवड केली जाणार आहे. असे असतानाच आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसा सरकारी आदेशच निघाला आहे.
उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे. आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. ही जबाबदारी कोणाला मिळणार, याची चर्चा रंगली होती. परंतु तेव्हा अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले होते. ते अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात बरीच अस्थिरता आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार? सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण खासदार होणार? सोबतच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार का? असा अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप मिळालेली नाहीत. असे असतानाच आता प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्षपद स्वत:कडे ठेवावे, यासाठी आम्ही आग्रह केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









































