विधानसभा पोटनिवडणुकित आप आणि काँग्रेसची बाजी, गुजराथमध्ये भाजपला फटका

0
8

नवी दिल्ली, दि . २४ ( पीसीबी ) : पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठरलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने मोठी बाजी मारली आहे. भाजपने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले असतानाही त्यांना केवळ गुजरातमधील कडी या सुरक्षित जागेवर विजय मिळवता आला.

पंजाब: लुधियाना वेस्टमध्ये AAPचा आत्मविश्वास वाढवणारा विजय
पंजाबमधील लुधियाना वेस्ट विधानसभा मतदारसंघात AAP चे संजीव अरोरा यांनी 10000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही जागा AAPचे आमदार गुरप्रीत गोगी यांच्या आत्महत्येमुळे रिकामी झाली होती. अरोरा यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी यांनी विशेष प्रयत्न केले. काँग्रेसचे भारत भूषण आशू दुसऱ्या स्थानी तर भाजपचे जीवन गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर होते.

गुजरात: विसावदरमध्ये गोपाल इटालिया यांचा दणदणीत विजय
गुजरातमधील विसावदरमध्ये AAPचे माजी राज्याध्यक्ष आणि पाटीदार आंदोलनातील चर्चित नेता गोपाल इटालिया यांनी भाजपच्या किरीट पटेल यांचा 17000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. ही जागा याआधी AAP कडे होती, मात्र भूपेंद्र भायाणी यांच्या भाजप प्रवेशामुळे रिकामी झाली होती. या विजयामुळे गुजरातमध्ये भाजपच्या एकाधिकाराविरुद्ध AAPने पुन्हा एकदा अस्तित्व दाखवले आहे.

गुजरात: केवळ कडी मतदारसंघ भाजपकडे
कडी मतदारसंघात भाजपचे राजेंद्र चावडा यांनी 39000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही सुरक्षित जागा फेब्रुवारीत आमदार कर्सन सोलंकी यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती. काँग्रेसकडून रमेश चावडा आणि AAPकडून जगदीश चावडा हे उमेदवार होते.
केरळ: निलांबूरमध्ये काँग्रेस आघाडीचा निर्णायक विजय
निलांबूरमध्ये काँग्रेस आघाडी (UDF) ने आपला मजबूत गड राखला. आर्याडन शोकत यांनी डाव्या आघाडीचे एम. स्वराज यांचा 11000 मतांनी पराभव केला.

शोकत हे माजी मंत्री आर्याडन मोहम्मद यांचे पुत्र असून त्यांचा मोठा जनाधार आहे. ही जागा प्रियंका गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

पश्चिम बंगाल: कालीगंजमध्ये तृणमूलची धमाकेदार कामगिरी
नदिया जिल्ह्यातील कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलीफा अहमद यांनी 50000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही जागा त्यांच्या वडिलांचे, माजी आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती.

मतमोजणी दरम्यान परिसरात स्फोट झाल्याने एका किशोरीचा मृत्यू झाला. भाजपने हा आरोप केला की, विजयानंतर तृणमूलच्या मिरवणुकीत स्फोटकांचा वापर झाला.

कालीगंज हे प्रामुख्याने ग्रामीण आणि मुस्लिमबहुल मतदारसंघ असून येथील निकाल २०२६ च्या निवडणुकांसाठी दिशा ठरवणारा मानला जात आहे.