महापालिका प्रभाग रचनेत आता नगरविकास विभाग, निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये शक्यता

0
9

मुंबई, दि . २४ ( पीसीबी ) –
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका आता ऑक्टोबर महिन्यानंतर होतील, हे निश्चित झाले आहे. या निवडणुकांसाठीच्या प्रभागरचनेचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ६ ऑक्टोबरनंतर, तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना १३ ऑक्टोबरला अंतिम होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, प्रभाग रचना तयार झाल्यावर ती नगरविकास विभागाकडून पुढे जाणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकासाठी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठीचे परिपत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे कसे असणार याबद्दल जाणून घेऊया.

प्रारूप प्रभाग रचना तयार करणे: यामध्ये जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे आणि प्रारूप मसुदा तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या करणे या बाबींचा समावेश असणार आहे. हे काम १७ जून ते ३१ जुलै दरम्यान पूर्ण केले जाईल.
प्रारूप प्रस्ताव सादर करणे: तयार केलेला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान, तर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान सादर केला जाईल.
-मान्यता आणि हरकती: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्यानंतर २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील.
सुनावणी आणि अंतिम निर्णय: प्राप्त हरकती आणि सूचनांवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर ९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत अधिकारी शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम करून नगरविकास विभागाला पाठवतील, जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करेल.
अंतिम अधिसूचना: राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्यानंतर ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अधिसूचनेद्वारे ती प्रसिद्ध केली जाईल.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. २०२० पासून राज्यात अनेक वेळा निवडणुकांची तयारी झाली असली तरी, त्या प्रत्यक्ष झाल्या नाहीत. आता नवीन प्रभागरचनेच्या वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे.