येणारी पिढी हि बाहेरगावी न जाता आपल्या शहरात, देशातच राहिली पाहिजे, त्यासाठी काय करत येईल यासाठी आम्ही कटिबद्ध – माजी उपमहापौर तुषार हिंगे

0
7

पिंपरी : आरंभ सोशल फाउंडेशन आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबीर समारंभ काल रविवार दि.१५ जून २०२५ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे उत्साहात पार पडला. पिंपरी चिंचवड शहरातील चारशेहून अधिक दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शहराचे माजी उपमहापौर तुषार हिंगे, आरंभ फाऊंडेशनच्या संचालिका सौ सोनाली तुषार हिंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टॅब, स्मार्ट वॉच, बॅग आणि प्रशस्तिपत्रक असे बक्षिसांचे स्वरूप होते.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून युवा पत्रकार व मित्र सौमित्र पोटे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी सदस्य सदाशिव खाडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, आयआयबी शिक्षण संस्थेचे ॲड महेश लोहारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास अण्णा लुक्कर, आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदक अक्षय शुभांगी रविंद्र मोरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

यावेळी सौमित्र पोटे यांनी अगदी सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगितला, कि कशा प्रकारे त्यांना दहावीला कमी गुण होते. तरीही वडिलांच्या आग्रहास्तव सायन्सला ऍडमिशन घेतलं. मग १२ वी परीक्षेत नापास झालो, आणि मग आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. आर्ट्सला कॉलेजमध्ये अनेक व्यसनी मित्र सोबत होते. पण मी ठरवलं होत कि आपण हे करायचं नाही. चांगल्या विचारसरणीची माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत. तुम्हाला तुमच्या गोष्टी ठरवायच्या आहेत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. हळूहळू मी नाटकात काम करायला लागलो. माझी आवड जोपासली. नाटकाची आवड जोपासतच टीवायला विद्यापीठातून पाचवा आलो, कारण मी माझ्या आवडीचा क्षेत्र निवडलं होतं . पुढे जाऊन पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यातही मी जीव आतून सगळं शिकलो. त्यामुळे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मैत्रीचा सल्ला दिला कि आपल्याला जे आवडेल तेच करा. गुण कमी जास्त झाले तरी नाउमेद होऊ नका.

सौमित्र पुढे म्हणाले कि, प्रतिकूल परिस्थितिशी झगडा देऊन तुम्ही तुमच्या हिमतीवर हे गुण मिळवले. तुमच्या या इच्छेला, तुमच्या या उर्जेला तुषार भाऊंच्या माध्यमातून टर्बो इंजिन लागलं आहे. म्हणूनच तुमचा गुणगौरव होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी आरंभ सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे आणि त्याचे आयोजन करणारे तुषार हिंगे आणि सोनाली हिंगे यांचे विशेष कौतुक केले.

शत्रुघ्न काटे यांनी देखील यावेळी संबोधित करताना प्रथम तुषार हिंगे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा केला त्याबाबत काटे यांनी त्यांचे आभार मानले. काटे म्हणाले कि हि मुलं एवढी हुशार आहेत कि आपण लहानपाणी शिकलो कि A for Apple , B for Ball , पण ही मुलं A for Attitude, B for believed, C for Confidence आणि D for discipline असे मानणारी हि मुलं आहेत. हे स्मार्ट युग आहे. तुषार हिंगे आणि सोनाली हिंगे यांनी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या प्रभागापुरता विचार न करता तुषार हिंगे यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांचा आज येथे गौरव केला आहे. यावेळी विद्याथ्यांना सल्ला देताना काटे म्हणाले कि, आपल्या मनाशी खूणगाठ बांधा. आपण करिअरचा वेगळा मार्ग निवडा. असं करिअर करा कि हा देश तुमच्याकडे पाहिल. चांगले विचार मनात घ्या, असे म्हणत काटे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदाशिव खाडे यावेळी म्हणाले, तुषार भाऊंनी आरंभाच्या माध्यमातून हा गुणगौरव सोहळा जो आयोजित केला आहे, त्याला गुणांची अट ठेवली नाही. प्रत्येकाच्या गुणांचा गौरव करणं आणि प्रत्येकाच्या गुणाची सामाजिकरित्या वाहवा करणं अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. तुषार हिंगे आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. या सोहळ्यामुळे आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप मिळते, आणि शाब्बासकीची थाप मिळाल्यामुळे तेवढ्याच स्फूर्तीने पुढे आपण लढत राहतो. तुषार हिंगे आणि सोनाली हिंगे यांनी आठ वर्षांपासून घेतलेला हा वसा पुढेही सुरु राहील अशी ग्वाही यावेळी खाडे यांनी दिली.

आयोजक तुषार हिंगे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, येणारी पिढी हि बाहेरगावी न जाता आपल्या शहरात, देशातच राहिली पाहिजे, त्यासाठी काय करत येईल यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि भाजप पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा आरंभ सोशल फाउंडेशन असेल हे कायम तुमच्या सोबत असेल. आपल्या सुख दुःखात तसेच शैक्षणिक प्रगतीत कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासली तर आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी यावेळी तुषार हिंगे यांनी दिली.