दि . ४ ( पीसीबी ) – गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. दोन हजारांच्या नोटेप्रमाणे सरकार आता 500 रुपयांची नोटही बंद करण्याची शक्यता असल्याचे मेसेज फिरत आहेत. या चर्चेला आधार आहे तो म्हणजे आरबीआयचा (RBI) एक ताजा निर्णय. सर्व बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर 500 रुपयांची नोटही बंद केली जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर पीआयबी फॅक्ट चेक युनिटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पीआयबीने म्हटले आहे की, कॅपिटल टीव्ही नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने 500 रुपयांच्या नोट बंद केल्याची बातमी दाखवली आहे. यात कोणतेही तथ्य नाही आणि ते पूर्णपणे खोटे आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही आणि ती सध्याप्रमाणेच येत्या काळातही 500 रुपयांच्या नोटा चलनात राहतील.
आरबीआयने बँकांना नुकतेच काही निर्देश दिले आहेत. बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवावी असं आरबीआयने म्हटलं आहे. त्यानंतर आरबीआयच्या या निर्देशाचे मूल्यांकन अनेक अर्थतज्ज्ञांकडून केलं जात आहे. काही तज्ञांचा असा विश्वास आहे की हळूहळू जेव्हा या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात प्रसारित होतील, तेव्हा 500 रुपयांच्या नोटा काढता येतील.
500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात यावी, त्या नोटा चलनातून मागे घेण्यात याव्यात अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं. परंतु यावर पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्टीकरण दिल्यानंतर 500 च्या नोटा या चलनात कायम राहतील याबद्दल शंका उरली नाही.