… तर मराठी माणसाला गुजरातचा गुलाम बनविण्यात ते यशस्वी होतील

0
150

नाशिक, दि. १८ (पीसीबी) – केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या कारभाऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना संपविणे हे आहे. तसे केल्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाला गुजरातचा गुलाम बनविण्यात ते यशस्वी होतील, असा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २२ जानेवारीला नाशिक येथे होत आहे. त्याच्या तयारीसाठी आज शिवसेनेचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, युवा सेनेचे सचिव वरुण सरनाईक, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, बाळकृष्ण शिरसाट आधी प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत म्हणाले, नाशिक येथे होणारे शिवसेनेचे अधिवेशन महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या दिल्लीश्वरांनी मराठी माणूस आणि शिवसेनेला संपवण्याचा मोठा घाट घातला आहे. आपण सर्व याबाबत वेळीच सावध राहिलो नाही तर, महाराष्ट्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रातील काही महाराष्ट्रद्रोही नेते देखील भाजपचे हे कारस्थान पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. त्यांना यशस्वी होऊ न देणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे उद्दिष्ट असले पाहिजे.

नाशिक येथे होणारे शिवसेनेचे यंदाचे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि शिवसेनेला संकटात लुटण्यासाठी कारस्थान रचण्यात आले आहे. ते कारस्थान यशस्वी करण्यासाठी केंद्रातल्या सर्व यंत्रणांना व महाराष्ट्रातील भ्रष्ट लोकांना पुढे करण्यात आले आहे. मात्र मराठी माणूस हे कारस्थान वेळीच ओळखून दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या अधिवेशनाला दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहतील. हे अधिवेशन महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत राज्याच्या देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे ठरेल असे, श्री राऊत यांनी यावेळी सांगितले.