राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का ? केंद्र सरकार आपला राजशिष्टाचार का पाळत नाही ?

0
335

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार अजितदादा पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही ? , असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे.

प्रसिध्दीपत्रात ते म्हणतात, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते ? मा.ना.अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय ?

पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना मा.देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले असून पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना मा.ना. अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी, असेही वरपे यांनी म्हटले आहे.