आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार ?

bpcauthor bpcauthor
2 Min Read

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत घेतली. यावेळी एनडीमधील पक्षाच्या जवळपास ७० खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यामध्ये शिवसेना शिंदे गटाला फक्त एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे शिंदे गटात काहीसी नाराजी असल्याची चर्चा आहे. अशातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर लागलेल्या एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा”, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. यावर आता ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्सासंदर्भात माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
“दोन्ही गटाच्या दिशा वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत. एक गट एका दिशेला तर दुसरा गट दुसऱ्या दिशेला आहे. मात्र, त्या दिशा बदलून एका दिशेला आले तर निश्चितच स्वागत केलं जाईल. पण त्या विचारसरणीमध्ये आणि या विचारसरणीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकेकाळी शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहेत, असं सर्वजण म्हणायचे. मात्र, आता काही लोक शरद पवार आणि राहुल गांधी यांना आमचं दैवत म्हणायला लागले आहेत, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. पण त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) त्यांची स्टॅटर्जी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही”, असं मोठं विधान शिवेसना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

“शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. शिवसैनिकांसाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत. मात्र, ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कट कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपटी आणि कारस्थांनी लोकांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Share This Article