अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसचे १६ आमदार ?, संग्राम थोपटे काय म्हणाले…

3 Min Read

महाराष्ट्, दि. १२ (पीसीबी) – अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या बरोबर काँग्रेसचे तब्बल १६ आमदार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रथम शिवेसना फोडून ४० आमदार आणि १३ खासदार वेगळे झाले. दीड वर्षांपूर्वी शरद पवार यांची राष्ट्रवादीची दोन शकले पडली आणि अजित पवार स्वतंत्र झाले. आणखी मोठा भूकंप होणार असे भाजपचे गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ नेते बोलत होते. आता अशोक चव्हाण यांच्यासह अमित देशमुख, संग्राम थोपटे या बड्या आमदारांसह १६ जणांचा एक गटच भाजपला मिळणार असल्याच्या बातम्या आहेत.

पुणे राज्याच्या राजकारणात परत एकदा उलथापालथ होणार असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेल्याचं पाहायला मिळालं. आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात खिंडार पडतं की काय असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेमधील काही आमदारही त्यांच्यासोबत काँग्रेसला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातचे पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मला ही बातमी माध्यमांमधून कळाली, अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण म्हणजे माझ्यासाठी मानसिक धक्का आहे. अशोक चव्हाण आणि अमर राजूकर यांनी कुठल्या कारणामुळं राजीनामा दिला हे माहिती नाही. काँग्रेसचे आमदार, नेते भाजपमध्ये प्रवेश करणारं आहेत असं बोललं जातंय यावर आत्ताचं भाष्य करण योग्य ठरणार नाही. येत्या काळात चित्र स्पष्ट होईल, जे नेते पक्ष सोडून इतर पक्षात जातायत, ते का जातायत याची कारणं तेच चांगल्याप्रकारे सांगू शकतील, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याचा प्रश्नचं नाही, माझ्याबद्दल या आधीही अनेक वेळा वृत्तवाहिनी, प्रिंट मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या आहेत, त्या त्या वेळेला मी खुलासा केलेला आहे. त्यामुळं इतरत्र जाण्याच्या काहीच प्रश्न येतं नाही. जे पक्ष सोडून जाणार आहेत अशी चर्चा आहे, त्यांची काय नाराजी आहे हे मी सांगू शकत नाही. जर त्यांचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल काही मतभेद असले तर त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे या पक्षश्रेष्ठींशी त्यांनी चर्चा करावी, असंही थोपटे म्हणाले.

दरम्यान, मविआ सरकार असताना संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्ष म्हणूम थोपटेसुद्धा या रेसमध्ये होते. मात्र तेव्हाही त्यांच्या पदरी निराशा पडली होती. त्यामुळेथोपटे नाराज असल्याचं अनेकवेळा दिसून आलं होतं

Share This Article