या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका – मनोज जरांगे पाटील

bpcauthor bpcauthor
2 Min Read

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जीआर स्वीकारला आहे. सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा तमाम मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आपण याठिकाणी आलो होतो तो हेतू साध्य झाला आहे.

५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं यामागणीसाठी आपण येथे आलो होतो. जवळपास पाच महिन्यांपासून संघर्ष केलाय. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी अध्यादेश आवश्यक होता. या अध्यादेशासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. कुटुंब उघड्यावर पडले आहेत, असं ते म्हणाले.

अण्णासाहेब पाटलांपासून, मेटे, जावळे साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. नोंदी मिळालेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर सुरु करण्यात आले. नोंदी आढळल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांनाही प्रमाणपत्र द्यावं. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अध्यादेश काढला. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे धन्यवाद, असं ते म्हणाले.

मराठा आंदोलक उघड्यावर झोपले. आरक्षणासाठी तिनशे पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्र्यांकडे माझी एकच विनंती आहे, जो अध्यादेश काढलाय. कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अध्यादेश आला असला तरी ही एक कळकळीची विनंती आहे, असं जरांगे म्हणाले.

उपोषणासाठी जिवाची बाजी लावली. शरीर मला आता साथ देत नाही. दिवसरात्र मी झगडलोय, संघर्ष केलाय. आता जीआरसाठी गुलाल उधळला आहे. याचा अपमान होऊ देऊ नका. ज्याची नोंद आहे त्याचे शपथपत्र घेऊन त्याच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे शिंदे समितीला आणखी एक वर्ष काम करु द्या, गोरगरिब मराठ्यांचं भलं होऊद्या, असं ते म्हणाले.

१८८४ ची जनगणना स्वीकारण्यात यावी, त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांचे भले होईल. माझ्या जातीचा मला अभिमान आणि गर्व आहे. माझी जात एका शब्दाच्याही पुढे जात नाही. अनेक म्हणायचे आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, पण तुम्ही आम्हाला छेडलं तर आमचा नाईलाज होईल. आजही आम्ही ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद होऊ दिला नाही, असं ते म्हणाले.

Share This Article