“विद्रोह विवेकी असावा!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

0
173

पिंपरी, दि. २४ “जातिनिष्ठ हा बुद्धिनिष्ठ असू शकत नाही म्हणून कोणताही विद्रोह विवेकी असावा!” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे मंगळवार, दिनांक २३ जुलै २०२४ रोजी केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी आणि ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे आयोजित बाबा भारती जीवनगौरव, समाजभूषण, धम्मभूषण आणि साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार अध्यक्षस्थानी होत्या; तर नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बार्टी – पुणेचे महासंचालक सुनील वारे यांना बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच संभाजी खैरमोडे (बाबा भारती समाजभूषण), भगवान जाधव (बाबा भारती धम्मभूषण) तसेच प्रा. प्रभाकर दाभाडे, सुप्रिया सोळांकुरे आणि मानसी चिटणीस यांना बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “समाजात बहुजन आणि अभिजन हे दोन्हीही विचार आणि प्रवृत्ती नांदत असताना त्यांच्यात जातीयतेचे विष पेरून त्यांची विभागणी करणे योग्य नाही. याउलट त्यांच्यात समन्वय साधणे जास्त श्रेयस्कर आहे. दलित समाजातील जगन्नाथ कांबळे हे ‘बाबा भारती’ म्हणून जाती अंताचे काम करीत होते ही अभिमानास्पद बाब होती. अभिजन आणि बहुजन यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे कार्य त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान करीत आहे, ही प्रशंसनीय गोष्ट आहे. समाजव्यवस्थेत वैचारिक पातळीवरील ब्राह्मण्य संपले तरच खऱ्या अर्थाने ते संविधान सुसंगत कार्य होईल!” सुदाम भोरे यांनी, “साहित्याने माझ्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवून आणले. साहित्यिकांनी शेतकऱ्यांना बळ द्यावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. सुनीताराजे पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “लौकिकार्थाने आता हयात नसलेल्या बाबा भारती यांचे विचार आणि कार्य ३४ वर्षांनंतरही अस्तित्वात आहे, हे समाजासाठी दिलासादायक आहे. संस्कृती ही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असते. अंतर्मुख होऊन आपल्यातील माणसाचा शोध घेतला पाहिजे!” असे विचार मांडले.

सत्काराला उत्तर देताना सुनील वारे यांनी, “देशाच्या विविध भागात महापुरुषांच्या विचारांचा मागोवा घेण्याची संधी मला मिळाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पाली भाषेचे महत्त्व जाणवले आणि त्यावेळी पहिल्यांदाच बाबा भारती यांच्या शब्दकोशाची मदत झाली!” अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रवींद्र भारती, निमिष भारती, प्रकाश कांबळे, प्रशांत दीक्षित, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.