दि.१(पीसीबी)- मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका बाहेरचा परिसर, चर्चेगट स्थानक, हुत्मात्मा चौक या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमलेली बघायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी आंदोलक पोहोचले आहेत. आंदोलकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते जाम झाले आहेत. यामुळे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने बराच वेळ युक्तिवाद पार पडल्यानंतर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आंदोलकांनी आझाद मैदान वगळता सर्व रस्ते मोकळे करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
हायकोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
“प्रथमदर्शनी अंतरिम आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि अन्य प्रतिवादींनी प्रथमदर्शनी आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. तसेच त्यांना आझाद मैदानातील आंदोलनासाठी सध्या कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशाप्रमाणे आणि सार्वजनिक सभा, आंदोलने २०२५ अंतिम नियमावलीतील नियमांप्रमाणे सरकारने योग्य ती कार्यवाही करावी”, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
“मुंबईतील जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणि मुंबई ठप्प होऊ नये तसेच विशेषत: सध्याच्या गणेशोत्सवाबरोबर सर्व काळ आम्ही हे निर्देश आहोत. आंदोलकांनी रस्ते आणि सर्व संबंधित जागा आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता उद्या दुपारपर्यंत मोकळ्या कराव्यात. उद्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलकांनी रस्ते मोकळे करावेत आणि आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता मोगळ्या कराव्यात, असा महत्त्वाचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घ्यावी की, आणखी येणारे आंदोलक मुंबईत येणार नाहीत”, असा मोठा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
“आम्ही राज्य सरकारला आदेश देतो की, जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर त्यांना तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार देण्यात यावेत”, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला. “आता या याचिका नियमित खंडपीठासमोर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी ठेवण्यात येत आहेत”, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.