खून प्रकरणातील अल्पवयीन मुलगा खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात

0
362

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – बावधन येथे 26 जून रोजी झालेल्या खून प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करून खून केला होता.

पितबसा कमलचंद जानी (वय 57, रा. गंगा लिजंड लेबर कॅम्प, बावधन. मूळ रा. ओडिसा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपेंद्र पितबसा जानी (वय 17) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल करीम शेख (वय 22, रा. वारजे, पुणे) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. तर त्याचे साथीदार पळून गेले होते.

पितबसा आणि आरोपींचे २५ जून रोजी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी पितबसा यांच्या घराजवळ जाऊन कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात आणि हातावर सपासप वार करून खून केला. खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि विजय नलगे यांना माहिती मिळाली की, या खून प्रकरणातील अल्पवयीन मुलगा सुसखिंड येथे टेकडीजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.