Desh

ईडीच्या भितीमुळे एकनाथ शिंदे यांचा एल्गार नवी

By PCB Author

June 21, 2022

दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन ठाकरे सरकार विरोधात पुकारलेला एल्गार हा केवळ ईडीच्या भितीमुळे असल्याची माहिती सुत्राने दिली. सत्तेविना कासाविस झालेले विधासभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना लक्ष्य करणे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याचा धडाका सुरू केला. महाराष्ट्रातील भाजपच्या वगळता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांना आयकर, ईडीच्या नोटीस येणे आणि त्यांची चौकशी करण्याचा सपाटा सुरू झाला आह. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मंत्री तुरुंगात आहेत. अद्याप त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत परंतु गेले अनेक महिने ते तुरुंगात खितपत पडले आहेत. मध्यंतरी शिवसेनेचे संजय राऊत आणि अनिल परब यांच्याही चौकशी झाल्यात. लवकरच अनिल परब यांचाही अनिल देशमुख होईल असे भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात. शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार बनविणे हे फडणवीस यांच्या खूपच जिव्हारी लागले आहे. शिंदे होणार होते मुख्यमंत्री! महाविकास आघाडीचे सरकार झाले तेव्हा उद्वव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले होत. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरल्याने शिंदे मागे पडले. परंतु ठाकरे यांनी महत्वाचे खाते ठेवून त्यांना सतत दुसऱ्या क्रमांकावर ठेवले. सरकारच्या अडिच वर्षाच्या काळात शिंदे यांनी बरीच माया जमवल्याचा विरोधीपक्ष भाजपने आरोप केला होता. परंतु देशमुख, परब, मलिक, राऊत यांच्यासारखे त्यांच्यामागे ईडी, सीबीायचे खेकटे लागले नव्हते. शिंदे काही आमदारांना घेऊन आपल्यासोबत आले तर सरकार बनू शकते याचा विश्‍वास पटल्यावर फडणवीस यांनी शिंदे यांच्यावर जाळे फेकल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. कालच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला १३२ मते मिळाल्याने फडणवीस यांचा आत्मविश्‍वास बळावला आणि काही तासातच पुढचे नाट्य सुरू झाले.